निष्ठावंतांना डावलल्यास तालुक्यातील कार्यकर्ते बंडाच्या तयारीत
चार इच्छुकांनी दिल्या मुलाखती
कोपरगाव – निष्ठावंत शिवसैनिकाला विधानसभेची उमेदवारी न दिल्यास आयात केलेल्या उमेदवाराच्या विरोधात बंड करण्याचा चंग बांधल्याची माहिती शिवसैनिकांतून पुढे आली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती नाही झाली, तर निष्ठावंत शिवसैनिकाला विधानसभेची उमेदवारी द्यावी, यासाठी मुंबई येथील सेनाभवनामध्ये झालेल्या इच्छुकांमध्ये कोपरगावातील चार शिवसैनिकांनी मुलाखती दिल्या.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, नितीन औताडे, माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी खासदार अनिल देसाई, दीपक सावंत, अरविंद नेरकर यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथे शिवसेनेच्या निष्ठावंताला उमेदवारी द्यावी. निष्ठावंताला डावलून पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला, तर त्या उमेदवाराच्या विरोधात शिवसैनिक आपली भूमिका बजावतील, अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी दिली. लवकरच शिवसेनेचा उमेदवार निश्चित होईल. आयात केलेल्या उमेदवाराला सहकार्य केले जाणार नाही.
तसेच शिवसेना-भाजप युती होण्याची शक्यता जर तर वर येऊन ठेपली आहे. तेव्हा विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी शिवसेना पक्ष स्वतंत्रपणे तयारी करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेवटच्या क्षणाला झालेला कोणताही निर्णय असला, तरी शिवसैनिकांनी प्रत्येक मतदारसंघांमध्ये आपले काम गतिमान करावे, असेही वरिष्ठांनी सांगितल्याचेही लबडे म्हणाले. दरम्यान, कोपरगावमध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. परंतु अंतर्गत गटबाजीही तितकीच असल्याने तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन झाले, तर सेनेची ताकद वाढेल. अन्यथा गटांमध्ये विखुरलेली सेना कुचकामी ठरेल. लबडे गेल्या दोन-तीन वर्षांपासून मतदारसंघात वेगवेगळ्या प्रकारे संपर्क वाढवीत आहेत.
विखुरलेली सेना संघटित करण्याचे काम सुद्धा त्यांनी केले. परंतु मातोश्रीचा निर्णय ऐनवेळी काय असेल, याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे. दरम्यान शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांना उमेदवारी द्यावी यासाठी अनेक वेळा शिवसैनिकांमधून मागणी केली जाते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळेस निर्णय बदलला जातो. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उमेदवाराविरोधात काम करून त्याचा पराभव केला.
शिवसैनिकांनी शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात काम केल्याने सेनेचे उमेदवार आशुतोष काळे यांचा पराभव झाला, तर भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा विजय सुखकर झाला, अशीही चर्चा मतदारसंघांमध्ये केली जाते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोपरगाव तालुक्यातील उमेदवारांच्या बाबतीत अजूनही पक्षश्रेष्ठींनी निश्चित निर्णय दिलेला नसला, तरी निवडणुकीची स्वतंत्र तयारी सेनेच्यावतीने सुरू आहे. आगामी काळात शिवसेना-भाजप युती होती की नाही, स्वतंत्र निवडणूक लढवण्याची वेळ आली तर शिवसेना-भाजप युतीचे कोण कोण उमेदवार राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.