निवडणुकीतील विजयानंतर मेढ्यात येणे टाळले; डबल ढोलकी चालणार नसल्याचा इशारा
मेढा: विधानसभा निवडणुकीत सातारा-जावळी मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजे भोसले हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. विजयानंतर गावागावातील कार्यकर्त्यांना भेटणाऱ्या नवनिर्वाचित आमदारांनी मेढा शहराला वगळले. त्यामुळे ते येथील कार्यकर्त्यांबद्दल नाराज आहेत की, कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना मेढ्यात येणे शक्य झाले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मेढा शहरात शिवेंद्रराजे यांना झालेल्या मतदानाबद्दल दै. “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. शिवेंद्रराजेंनी मेढा शहरात सर्व ताकद पणाला लावली तरी त्यांना मिळालेल्या अल्प मताधिक्याचा लेखाजोखा या वृत्तात मांडण्यात आला होता.
निवडणुकीतील विजयानंतर शिवेंद्रराजे यांनी कुडाळ व इतर गावांना भेटी दिल्या. मेढ्यापासून दीड किलोमीटरवर असलेल्या करंजे येथील कार्यकर्त्यांचे आभार मानायला राजेंनी आवर्जून उपस्थित लावली; परंतु परत जाताना मेढा येथे न थांबता गाडी थेट सातारच्या दिशेने वळवली. ते मेढ्यातील कार्यकर्त्यांवर नाराज आहेत की, कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांची भेट झाली नाही, असा प्रश्न भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी विचारत आहेत. कुडाळ येथे मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानताना, यापुढे डबल ढोलकी वाजवणारे कार्यकर्ते चालणार नाहीत, अशी तंबीही त्यांनी दिली.
शिवेंद्रराजे म्हणाले, निवडणुकीपूर्वी अनेक जण माझ्या संपर्कात होते. काही जण कारखान्याचे कामगार तर काही जण सहकारी म्हणून काम करत होते. मात्र, त्यांच्या गावातच मतदान कमी पडल्याने आणि त्याबाबतची आकडेवारी वृत्तपत्रांमध्ये छापून आल्याने, कोण कुठे कमी पडला की, काम करण्याची पद्धत चुकीची होती, हे पाहणे आता गरजेचे आहे. निवडणूक काळात माझ्या पाठीमागे कोणी कोणी काय काय दिवे लावले, ते लपून राहिलेले नाही. कुठे ना कुठे आणि कधी ना कधी तरी ते बाहेर येतेच. त्यामुळे कोणीही गैरसमजात राहू नये.
निष्ठावंतांच्या पाठीवर मी नक्की हात फिरवेन ज पण गद्दारी करणाऱ्यांच्या पाठीत धपाटा मारेन. आपल्याला आता भाजप म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. भविष्यात तशीच मांडणी करावी लागणार आहे. निष्ठावानांनी निर्णय घ्यायची वेळ आली आहे. भले पाच जण माझ्याबरोबर असले तरी ते प्रामाणिक, जीवाला जीव देणारे असावेत. दोन्ही दगडांवर हात ठेवणारे चालणार नाहीत.कुडाळ जिल्हा परिषद गटात पडलेल्या कमी मतदानामुळे शिवेंद्रराजे यांनी गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना जाब विचारला. भाजप वाढीसाठी जे निष्ठेने माझ्याबरोबर असतील त्यांनाच ताकद देईन; परंतु गद्दारी करणाऱ्यांना अद्दल घडवली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.