मुंबई: राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आ. नवाब मलिक यांनी केली आहे. राज्यात कारखाने बंद पडत आहेत, बेरोजगारी वाढत आहे अशातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले आहेत. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत संयुक्त पुरोगामी महाआघाडीतील सर्व मित्रपक्षांसोबत एक शिष्टमंडळ राज्यपाल महोदयांची भेट घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निवेदन देणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
सध्या सत्ता स्थापनेवरून सुरु असलेल्या गोंधळावर बोलताना मलिक म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा पूर्ण होत असताना अद्यापही राज्यात सरकार स्थापन करण्यात आलेलं नाही. जनतेने कौल शिवसेना भाजपाला दिलेला असल्याने त्यांनी लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन करावं. विरोधक या नात्याने जबाबदारी पार पाडण्याची आमची तयारी आहे. सद्यस्थितीत विरोधक म्हणून सक्षमपणे काम करण्याची पक्षाची भूमिका असल्याचे मलिक यांनी सांगितले.