रघुनाथ थोरात
पुनर्वसित नाणेगावात पाणी टंचाई; हिवाळ्यातच ग्रामस्थांवर भटकंतीची वेळ
चाफळ – पाटण तालुक्यातील उत्तरमांड मध्यम प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन नाणेगाव, ता. कराड येथे करण्यात आले आहे; परंतु प्रकल्पग्रस्तांच्या समस्या काही केल्या संपण्याचे नावच घेईनात. गावाला हिवाळ्यातच पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे. उत्तरमांड प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देऊन इतरांची तहान भागवणारे प्रकल्पग्रस्त स्वत: मात्र पाण्यापासून वंचित आहेत.
गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे जवळपास पूर्ण महाराष्ट्र महापुरात पुडला होता. त्याला पाटण तालुकाही अपवाद नव्हता. सह्याद्री पर्वतरांगांमधून वाहिलेले पावसाचे पाणी भविष्यातील गरज पूर्ण करणार, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, हे पाणी न अडविल्याने वाहून गेले आहे. त्यामुळे हिवाळ्यातच पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. चाफळपासून दोन किमी अंतरावर गमेवाडी येथे उत्तरमांड नदीवर मध्यम धरण प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पातील बाधित कुटुंबांचे कळंत्रेवाडी, ता. कराडनजीक नाणेगाव गावठाणात पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यात सुमारे 86 कुटुंबे आहेत. पुनर्वसनातील तरतुदीनुसार मिळणाऱ्या 18 नागरी सुविधांचा या गावाठाणात वानवा आहे. त्यात नाणेगावात पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे.
भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने नाणेगाव (पुनर्वसित) आणि परिसरातील विहिरी, कूपनलिका कोरड्या पडू लागल्या आहेत. दि. 26 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत पाणी टंचाईवर जोरदार चर्चा झाली; ग्रामपंचायत अथवा पंचायत समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी या समस्येकडे लक्षच दिले नाही. अखेर ग्रामस्थांनी प्रशासनावर अवलंबून न राहता गेल्या आठवड्यात श्रमदानातून विहिरीतील गाळ काढला. मात्र, त्यामुळे विहिरीची पाणीपातळी अपेक्षेइतकी वाढली नाही. सध्या काही घरांमधील नळ जोडण्यांना अर्धा तासच पाणी येत आहे.
त्यामुळे महिला वर्गाला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील इतर विहिरी, बोअरवेल व शेतातील पाण्याच्या चेंबरवर जाऊन पिण्यासाठी व इतर वापरासाठी पाण्याची सोय करावी लागत आहे. त्यातून महिलांची तारेवरची कसरत होत आहे. पिण्याच्या पाण्याचीच टंचाई असल्याने आंघोळ व इतर कारणांसाठी उपलब्ध पाण्याचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे भविष्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने नवीन बोअरवेल किंवा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने प्रकल्पग्रस्त आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.