मुंबई : एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झालेले आहेत. एवढेच नाही तर आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इकडे महाविकास आघडी सरकार पडण्याच्या जोरदार चर्चा चालू असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना शिवसेनेने एक पत्र पाठविले आहे. शिवसेनेच्या आमदारांना शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी हे पत्र पाठवले आहे. मात्र शिवसेनेच्या पत्रानंतरही आमदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळते आहे.
काय आहे शिवसेनेच्या पत्रात ?
पार्श्वभूमीवर पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवार दि. 22 जून, 2022 रोजी, वर्षा बंगला, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई 400006 येथे सायंकाळी 05.00 वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.
सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्यावर पाठविली आहे. त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमे, व्हॉट्स अॅप आणि एस.एम.एस. द्वारेही कळविली आहेत. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहाता येणार नाही.
सदरहू बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
अशा आशयाचे पत्र शिवसेनेच्या आमदारांना पाठवण्यात आले आहे.