पुणे – “महापालिकेच्या माध्यमातून पुणेकरांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक मुलभूत सेवा-सुविधा मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत पुणेकरांचा भ्रमनिरास झाला आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना ही पुणेकरांची ताकद म्हणून सत्तेवर येईल,’ असा विश्वास शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी व्यक्त केला. मोरे आणि थरकुडे यांनी “प्रभात’ कार्यालयास मंगळवारी सदिच्छा भेट दिली.
यावेळी मोरे म्हणाले, “पुणे महापालिका निवडणुकांसाठी पक्षाने मुंबईप्रमाणेच पुण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी स्वत: खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन अहिर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर यांच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. कशा प्रकारे काम करावे, पुणेकरांसमोर जावे, लोकांच्या समस्या कशा सोडवाव्यात, प्रत्येक यादीवर गटप्रमुख सक्षम असावा आणि त्यासोबतच इमारत प्रमुख ही संकल्पना आम्ही मुंबईच्या धर्तीवर आम्ही राबवत आहोत. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही संघटनात्मक बांधणी सुरू असून त्याचा मोठा फायदा पक्षाला होणार आहे.’
थरकुडे म्हणाले, “पुणेकरांनी सत्ताधाऱ्यांना विश्वासने संधी दिली होती. मात्र, त्यांनी ती गमावली आहे. त्यामुळे, त्यांनी अर्धवट सोडलेल्या विकासाला चालना देण्याचे काम महापालिकेत सत्तेवर येणारी शिवसेना करेल. तसेच पुणेकर जनतेची ताकद म्हणून महापालिकेत जाईल. पक्षाकडून या निवडणुकीत सुमारे 25 टक्के उमेदवारी युवकांना देण्यात येणार आहे. युवासेना ही पक्षाची ताकद आहे.’