मुंबई – साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिलाय पण घरातील चुलीच विझल्या,पोटातील आगडोबा उसळला तर फुलांच्याही ज्वाला होतील शिर्डीतील वातावरण सध्या हेच सांगत आहे असा इशारा शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे. शिर्डीमध्ये सुरु असलेल्या हार फुलांच्या वादावरून सामनातून सरकारवर निशाणा साधण्यात आलाय .
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डेप्युटींसह ‘अर्जंट’ दिल्लीस जावे व शिर्डीतील हार-फुलांसंदर्भातील काय निर्णय घ्यावा यावर निकाल घेऊन यावे. तोपर्यंत साईबाबांनी भक्तांना शांत राहण्याची सुबुद्धी द्यावी. लोक भडकले, फुले पेटली तर संत साईबाबांवर ईडी आणि सीबीआय कारवाईचे आदेश दिले जातील. तेव्हा फुलांनो, कळ्यांनो, संतांनो शांत राहा! देवांनो गप्प बसा. फुले फक्त मंत्र्यांसाठी आहेत. या नव हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात देव कोरडेच राहणार आहेत. अशी टोलेबाजी सामनातून करण्यात आली आहे.
राज्यात सध्या हिंदुत्वाच्या नावाने बऱ्याच गमतीजमती सुरू आहेत व त्यावरुन देव आणि संतांच्या दरबारात राडे केले जात आहे. सर्वधर्मीय संत व श्रद्धेचे पीठ असलेल्या साईबाबांच्या शिर्डीतील हार, फुले, नारळ बंदी उठायला तयार नाही. भक्तींनी शिर्डीत हार, फुले, नारळ वगैरे न्यायचे नाहीत हा फतवा उठावायला महाराष्ट्रातील तोतया हिंदुत्वावाद्यांचे सरकार तयारी नाही, अशी टीका देखील सामनातून सत्ताधाऱ्यांवर करण्यात आली आहे.