शिवसेनेकडून लोकसभेत प्रश्न उपस्थित, सीतारामन यांच्याकडे मागितले स्पष्टीकरण
नवी दिल्ली : बुलेट ट्रेनसह महाराष्ट्राच्या विकासकामांसाठी आलेला 40 हजार कोटी रुपयांचा निधी परत पाठवण्याच्या कथित कृतीबाबात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी आज लोकसभेत लावून धरली.
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राने पाठवलेला निधी परत पाठवण्यासाठी 80 तासांपेक्षा कमी काळासाठी सरकार स्थापन केले, असा आरोप केला जात आहे, असा मुद्दा शुन्य प्रहरात शिवसेनेचे खासदार विनायक राऊतउपस्थित केला.
ते म्हणाले ही माहिती अन्य कोणी नाही तर भाजपाचे खासदार आणि माजी मंत्री असणाऱ्या अनंतकुमार हेगडे यांनीच माध्यमांना तीनवेळा दिली आहे.केंद्र सरकारचा 40 हजार कोटी रुपयांचा निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून बहुमताचा पाठींबा नसतानाही फडणवीस हे मुख्यमंत्री बनले, असे हेगडे म्हणाले आहेत. त्यांनी रविवारी येल्लापूर येथील जाहीर सभेत हा आरोप केला होता. केंद्र सरकारचे पैसे वाचवण्यासाठीच हे नाटक केले होते, असे ते म्हणाले होते.
हा प्रकार घडला की नाही याचे उत्तर निर्मला सीतारामन यांनी द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली. हेगडे यांचा दावा संपूर्ण असत्या असल्याचा दावा फडणवीस यांनी सोमवारी केला होता.