मुंबई – कंगनाने शेतकरी आंदोलकांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेनेने भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी ‘आतंकवादी’ किंवा ‘दहशतवादी’ आहेत असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
शिवसेनेने म्हंटले कि, पाशवी बहुमत, जोरजबरदस्तीच्या दंडेलीवर कृषी विधेयक मंजूर करून घेतले. पण पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशात या विधेयकाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी त्यांनी चक्काजाम केला आहे. हे सर्व संयमाने आणि शांततेने सुरू असताना शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधणे हे कसले लक्षण मानावे? शेतकऱ्यांवर लाठीमार केला, गुन्हे दाखल केले हा तर अतिरेकच म्हणावा लागेल. ‘बाबर’ सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता; पण हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरविले. आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय? पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत असे आम्हाला कधीच म्हणायचे नाही.
गरीब शेतकऱयांना कोणी बेइमान म्हणा, नाहीतर आतंकवादी. ते बिचारे काय करणार? कोणाचे काय वाकडे करणार? अन्याय असह्य झालाच तर पोराबाळांसह आत्महत्येचा मार्ग स्वीकारतील. वर्षानुवर्षे हेच तर सुरू आहे. शेतकरीराजा दहशतवादी, मुंबई पाकिस्तान, महापालिका बाबराची फौज वगैरे वगैरे. बाकी सर्व सोडा हो! पण सत्ताधारी भाजप मंडळाने शेतकऱ्यांचा अवमान झाल्यावर तरी तोंडावरचे मास्क काढावे हीच एक अपेक्षा आहे.
हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरविले. आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय? किसानांचा अवमान हा सीमेवरील जवानांचाही अवमान आहे. स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या लाखो कष्टकऱ्यांचा अवमान आहे. सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारविरोधी उभ्या ठाकलेल्या बार्डेली सत्याग्रहातील शेतकऱ्यांचा अवमान आहे. त्या अवमानावर नटीच्या प्रेमाखातर कोणी फुले उधळत असतील तर इतिहास त्यांना माफ करणार नाही, अशा शब्दात सामानाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, कंगनाने शेतकरी आंदोलकांना दहशतवादी संबोधल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आला होता. त्यावरही कंगनाने विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदी जी, जे झोपले आहे त्यांना जागे करता येईल मात्र, जे झोपेचे सोंग करत आहेत त्यांना कसे समजावून सांगणार, असेही ट्विट कंगनाने केले होते.