विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, युतीच्या जागावाटपाचाही तिढा सुटलेला आहे. आता राज्यातील इच्छुकांची मते जाणून घेण्यासाठी, कोणता मतदारसंघ कोणासाठी चांगला याची महिती घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठक बोलवली आहे. त्यामुळे शनिवारी पदाधिकाऱ्यांसह इच्छुक “मातोश्री’वर पोहोचणार आहेत.
“मातोश्री’वरून बोलावणे आल्यामुळे इच्छुकांची आतापासून तयारी सुरू झाली आहे. परंतु, पुणे शहरातील आठही विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे या आठपैकी शिवसेनेला कोणता मतदारसंघ सुटणार हे अजूनही गुलदत्यातच आहे. कारण, शिवसेनेकडून 4 जागांवर मागणी करण्यात येणार असून, किमान 2 जागा तरी मिळाव्यात, अशी अपेक्षा पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांकडून करण्यात आली. परंतु, “आठही मतदारसंघात “भाजप’चेच उमेदवार असतील, असे भाजपतील पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. ही सर्व मागणी शहर पातळीवर होत असली तरीही पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे लवकरच समोर येणार आहे.
कोथरूड कोणाला सुटणार
हडपसर, खडकवासला, शिवाजीनगर यापैकी केवळ एक विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येईल, अशी शक्यता आहे. तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये भाजपमध्येच उमेदवारीवरून “तु..तु..मै..मै..’ सुरू आहे. त्यामुळे हा मतदारसंघ बदलणार की, उमेदवार बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यातील या एकंदरीत मतदारसंघाचा आढावा, इच्छुक उमेदवारांची मते आणि सद्यस्थिती जाणून घेण्यासाठीच मातोश्रीवर शिवसेनेचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली आहे.