पारनेर , -मागील सात-आठ महिन्यांपासून तालुक्याचे राजकारण बदलले आहे. सध्या करोना संकट आहे. आज ना उद्या आपण या संकटातून बाहेर पडणार आहोत. कोणतेही संकट कायमस्वरूपी नसते. त्यानंतर पुन्हा एकदा तालुक्याच्या विकासाला गती द्यायची आहे. योग्य वेळेला आपण तालुका योग्य दिशेने नेऊ. आपण काही रण सोडणारे नाही. शिवसैनिक कधीच रण सोडत नाहीत, असे प्रतिपादन माजी आमदार विजयराव औटी यांनी केले.
पारनेर तालुक्यातील कोकडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी औटी बोलत होते. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रथमच त्यांनी एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र त्यांनी यावेळी भविष्यात शिवसेना तालुक्यात पुन्हा जोमाने उभी राहील, असा संदेश दिला. यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, बाबा तांबे, रामदास भोसले, विकास रोहकले, राहुल शिंदे, नितीन शेळके, सरपंच डॉ. साहेबराव पानगे, शंकर नागरे, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते.
औटी म्हणाले, निवडणुकीमध्ये यश-अपयश हे येत असते. मला तालुक्याने पंधरा वर्षे संधी दिली आहे. त्या संधीचे सोने केले आहे. सध्या चाललंय ते उत्तम चालले आहे, हे असंच चाललं पाहिजे, यातच आपला जास्त फायदा आहे. जे चाललंय त्याची तुलना माझ्या 15 वर्षांच्या कारकिर्दीशी होणार आहे. ते सोपं नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पुढचे दिवस आपले आहेत. यापुढे देखील आपण तालुक्याच्या विकासाच्यादृष्टीने काम करत राहणार आहोत.