नाशिक : महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेली शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. आजपासून या योजनेअंतर्गत केवळ पाच रुपयात थाळी मिळणार असून ही थाळी मिळण्याची वेळ देखील वाढवली आहे. रोज 11 ते 3 या वेळेत ही थाळी आता 10 रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळेल, अशी घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भुजबळ यांनी, शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे. आजपासून यावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. रोज एक लाख लोकांना ही थाळी देण्यात येईल असे भुजबळ म्हणाले. पुढील तीन महिने ही सवलत देण्यात आली असून यासाठी 160 कोटींचा कार्यक्रम आखला आहे. कोरोनामुळे ज्यांना अन्न मिळत नाही, बेघर आहेत त्यांना शिवभोजनमध्ये जेवण मिळणार असल्याचे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, या दरम्यान शिवभोजन थाळी केंद्रात रोज निर्जंतुकीकरण केले जाईल. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मास्क वापरावे. मास्क आणि सॅनेटायझर आता अत्यावश्यक सेवेत आणले आहेत. त्यांनी सांगितले की, स्वस्त धान्य दुकानात 2 महिन्याचे अधिकचे धान्य उपलब्ध आहे. 6 महीने पुरेल एवढे अन्न धान्य आपल्याकडे उपलब्ध आहे.
ते म्हणाले की, सर्वसामान्य व्यक्ती, कामगार, मजूर, उद्योगधंदे, अर्थव्यवस्था, सरकार या सगळ्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. मात्र,आता कोरोना सोबतची लढाई जिंकणं सगळ्यात महत्वाचं आहे. कोरोनाची भीषणता भयानक आहे. लोकांनी नाशिकमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. गर्दी झालेली असेल तर पोलीस त्याबाबत तात्काळ कारवाई करत आहेत, असंही ते म्हणाले.