शिर्डी -करोनाच्या संकटात संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प पडले होते. या काळत शिर्डी येथील साई मंदिरही दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे भाविक शिर्डीत न आल्याने देगण्यांचा ओघही कमी झाला होता. मात्र या काळातही साई संस्थानमधील सहा हजारांहून अधिक कर्मचारी कर्तव्य बजावत होते.
देणग्यांचा ओघ कमी झाल्याने या कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे, असा प्रश्न संस्थानसमोर आहे. त्यामुळे निर्णय न झाल्याने मागील 15 दिवसांपासून कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.
देशभरात लॉकडाऊन असल्याने मागील नव्वद दिवसांपासून साई समाधी मंदिर बंद आहे. एरव्ही दररोज लाखो भक्तांची वर्दळ असलेली शिर्डी ओस पडली असून, साईभक्तांवरच येथील सर्व व्यवसाय अवलंबून असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पहावयास मिळत आहे. त्यामुळे अनेक परप्रांतीय छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी कामगारांनी घरचा रस्ता धरला आहे. त्यांची संख्या जवळपास पंधरा हजार इतकी आहे.
अशातच साई संस्थानला उत्पन्नाचे देणगी शिवाय दुसरे कोणतेही साधन नसल्याने भक्तच नसल्याने देणगी कोठून मिळणार? त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचे करोडो रुपयांचे वेतन कसे करायचे, असा प्रश्न साई संस्थानसमोर आहे. मागील महिन्यात बॅंकेत असलेल्या ठेवींच्या पावत्या मोडून कर्मचाऱ्यांचे वेतन केले होते. तसेच दैनंदिन लाखो रुपयांचा खर्च इतर कामांसाठी खर्च केले जातो. तोही अनिवार्य आहे. खर्चात कपात म्हणून श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साईनाथ हॉस्पिटलमधील तज्ज्ञडॉक्टरांचा इन्सेन्टिव्हही बंद केला आहे.
तसेच कंत्राटी कामगारांच्या वेतनात चाळीस टक्के कपात केली आहे. अनेक कंत्राटी कामगारांना बिनपगारी सुट्या दिल्या आहेत. मात्र ज्या वेतनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो, तेच पंधरा दिवस झाले, तरी अजूनही देण्यात न आल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. याविषयी व्यवस्थान समितीचा निर्णय न झाल्याने संस्थान कर्मचारी संभ्रमात पडले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे रजेवर असल्याने आता संस्थान कर्मचारी वेतनाचा निर्णय कोण घेणार? याच्या प्रतीक्षेत आहेत.