पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अभिनंदाबद्दल आभार मानले आणि पाकिस्तानला भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध हवे असल्याचे सांगितले. तसेच शरीफ यांनी जम्मू आणि काश्मीरसह अन्य वाद शांततेत सोडवण्याची गरज असल्याचेही प्रतिपादन केले. मोदींच्या अभिनंदन संदेशाला उत्तर देताना शरीफ यांनी ट्विट केले की, “पाकिस्तान भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध इच्छितो. जम्मू-काश्मीरसह अन्य वादांचे शांततापूर्ण निराकरण आवश्यक आहे. दहशतवादाविरुद्ध लढताना पाकिस्तानचे बलिदान सर्वश्रुत आहे. चला शांतता राखूया आणि आपल्या लोकांच्या सामाजिक-आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करूया.
पंतप्रधान मोदींनी शरीफ यांचे केले अभिनंदन –
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी शरीफ यांची पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि म्हटले की, भारताला दहशतवादमुक्त प्रदेशात शांतता आणि स्थैर्य हवे आहे, जेणेकरून आम्ही आमच्या विकासाच्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करू शकू आणि लोकांची समृद्धी त्यांचे कल्याण सुनिश्चित करू शकू. सोमवारी आपल्या भाषणात शरीफ यांनी काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला आणि आरोप केला की काश्मीर खोऱ्यात लोकांचे रक्त वाहत आहे, प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर हा मुद्दा उपस्थित करण्याबरोबरच पाकिस्तान राजकिय पाठिंबा देईल, असे म्हंटले होते.
शरीफ म्हणाले की, त्यांना भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, परंतु काश्मीर प्रश्नावर तोडगा काढल्याशिवाय ते साध्य होऊ शकत नाही. तीन वेळा माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ऑगस्ट 2019 मध्ये भारताने जम्मू आणि काश्मीरचे विशेष अधिकार काढून घेण्याची आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याची घोषणा केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले होते.