मुंबई : राज्याच्या राज्यपाल पदावर विराजमान झाल्यापासून ते परवा-परवापर्यंत महापुरुषांबद्दल नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे राज्यामध्ये राज्यपाल बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आज कोल्हापूरमध्ये बोलत असताना शरद पवार यांनी कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रावरून मोजक्या शब्दात टीका करताना राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होत आहे ही चांगली गोष्ट असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राज्यामध्ये राज्यपाल कोण होणार? याची चर्चा रंगली आहे. यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत अजून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, राज्यामध्ये कोण राज्यपाल येणार हे माहित नाही. मात्र, आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ही चांगली गोष्ट आहे.
दरम्यान,यावेळी देशात वादाचे कारण बनलेला बीबीसीचा माहितीपट याच्यावर देखील शरद पवार यांनी भाष्य केले. त्यांनी याविषयी बोलताना म्हटले,”माहितीपटावर बंदी घालणे हा लोकशाहीवर हल्ला आहे. तसेच धार्मिक मुद्यांवर लोक मतदान करणार नाहीत, असेदेखील म्हटले तसेच पवार यांनी राहुल गांधी यांच्या सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेवरू भाष्य केले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सामान्य नागरिकांकडून पाठिंबा दिला जात आहे. राहुल गांधी यांची प्रतिमा वेगळी भासवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यात्रेच्या माध्यमातून आता उत्तर मिळाले आहे.
एका सर्व्हेवरून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला लोकसभेलाल 34 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकार राहील की नाही अशी चिन्हे आहेत. त्यामुळे विरोधकांची एकी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, अजूनही कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या असून त्या पहिल्यांदा सोडवाव्या लागतील. विरोधकांच्या समन्वयाबाबत दिल्लीमध्ये चर्चा सुरू होईल. बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांचा अजूनही सत्ताधाऱ्यांविरोधातील विरोध कमी झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.