नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शुक्रवारी ही यात्रा काश्मीरमध्ये दाखल झाली तेव्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यादरम्यान ते प्रवास मध्येच सोडून निघून गेले. त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत गृह मंत्रालयाला पत्र लिहिले आहे.
“येत्या दोन दिवसांत यात्रेसाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे. यामध्ये श्रीनगरमध्ये ३० जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमालाही गर्दी होऊ शकते. तुम्ही वैयक्तिकरित्या हस्तक्षेप करून पुरेशी सुरक्षा पुरवल्यास मी आपला आभारी राहीन” असं खर्गे यांनी आपल्या पत्राद्वारे म्हंटले आहे. राहुल गांधींच्या यात्रेदरम्यान त्यांना भेटण्यासाठी अनेक जण सुरक्षा रक्षकांचा घेरा तोडून आल्याचे देखील पाहायला मिळाले होते.
खन्नाबलमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधींनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, आम्हाला पुढे चालायचे होते, पण बाहेरील सुरक्षाकडे सांभाळण्यासाठी असलेली पोलीस दुर्दैवाने कुठेतरी गायब झाले होते. माझ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पुढील प्रवास न करण्याचा सल्ला दिला. यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे असं राहुल गांधी म्हणाले.
जम्मू-काश्मीर प्रशासनाने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील सुरक्षेतील त्रुटींचे आरोप फेटाळून लावले आहेत. सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अशा आव्हानात्मक आणि विशेष कार्यक्रमासाठी राज्य सरकार सुरक्षेबाबत गंभीर आहे. यात्रेच्या सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती स्थानिक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.