नवी दिल्ली – दोन वर्षांत भाजपच्या अनेक संस्थांनी छापे टाकले, मग एकही पैसा का मिळाला नाही? आप नेत्यांना जेलमध्ये टाकून आता मला अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडीने कायदेशीर समन्स पाठवावे. कायदेशीर समन्सचेच पालन करेन, अशी प्रतिक्रीया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार केजरीवाल यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
शरद पवार म्हणाले,’जनतेने गेल्या 10 वर्षांत केजरीवाल यांना मतदान करुन सत्तेवर पाठवले आहे. मात्र त्यानंतर आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. आता अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठीही पावले उचलली जात आहे. ते पुढे म्हणाले, केजरीवाल यांना ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. केजरीवाल स्वच्छ प्रतिमेचे आहेत हे दिल्लीतील सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्यांना अटक झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही.’ असेही शरद पवार म्हणाले आहे.
तत्पूर्वी केजरीवाल म्हणाले, सीबीआयने ८ महिन्यांपूर्वी मला समन्स बजावले होते, मी गेलो होतो. पण ईडीचे समन्स बेकायदेशीर आहे. ज्यांचे भाजपशी पटत नाही, त्यांना ते तुरुंगात पाठवतात. या कारणावरून त्यांनी मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनाही तुरुंगात टाकले. त्यांनीही भाजपशी हातमिळवणी केली असती, तर ते तुरुंगाबाहेर आले असते. जो त्यांच्याशी हातमिळवणी करतो, तो प्रामाणिक होतो. या देशात जे काही चालू आहे ते धोकादायक आहे. आपल्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी आहे. आम्ही नेहमीच देशासाठी लढलोय, असेही केजरीवाल अखेरीस म्हणाले.