मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) हे आपला पक्ष वाचवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन बसतात, यात सर्व आले. खरं तर कार्यकर्त्यांना यावरून काय प्रकार सुरू आहे हे लक्षात आले आहे. त्यामुळे आता परतीचे दोर कापण्यात आले आहेत. आपल्याला लढायचं आहे. तसेच जिथं शरद पवार उभे राहतील, तिथं पक्ष असेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी व्यक्त केला.
वाय बी चव्हाण सेंटर (y b chavhan centere) येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर टीकास्त्र सोडले.
जयंत पाटील म्हणाले, समोरच्या बाजूने तुम्हाला असे सांगितले जाईल की, निवडणुकीला इतके पैसे खर्चायला देतो, तेवढे देतो. ते सगळं होईल, मात्र शिक्का मारायला माणसं कुठून आणणार? असा प्रश्न त्यांनी अजित पवार गटाला विचारला आहे. तसेच मतं देणाऱ्या माणसांच्या मनात शरद पवार आहेत. त्यामुळे शरद पवार जिथे उभे राहतील, तिथे पक्ष असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज निवडणूक आयोगाच्या दारात आमची लढाई सुरू आहे. त्या सुनावणीत शरद पवारांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं जात आहे. मात्र 25 वर्षे शरद पवारांच्याच कार्यशैलीमुळे यांना पदं मिळाली, हे मंत्री झाले, वेगवेगळ्या पदांवर पोहचले. असे असले तरी आज 25 वर्षानंतर त्यांच्याच कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. मग 25 वर्षे तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली त्याचं काय? असा प्रश्न त्यांनी अजित पवार गटाला विचारला आहे.