सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकारण सोडतील पण भाजपबरोबर जाणार नाहीत. भाजपला देशात हुकुमशाही आणायची असून भाजपविरोधी सर्व पक्ष, संघटनांनी एकत्रित यावे, असे आवाहन भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष “उपरा’कार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केले. भटक्या विमुक्त जमाती संघटनेचा पाठिंबा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला असून शरद पवार हेच आमचे नेते आहेत, असेही श्री. माने यांनी स्पष्ट केले.
लक्ष्मण माने म्हणाले, “”देशात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागरिकांची मुस्कटदाबी सुरु केली आहे. भविष्यात हुकुमशाही आणण्याचा त्याचा प्रयत्न असून त्यांच्याबद्दल बोलणारांविरोधात केंद्रीय एजन्सींचा वापर केला जात आहे. राज्यात झालेले सत्तानाट्य म्हणजे भाजपचे यश नसून केंद्रीय एजन्सींचे यश आहे. या एजन्सींचा वापर करुन पक्ष फोडाफोडीचे काम सुरु असून हे लोकशाहीसाठी घातक आहे.
माझ्यावर कोणतीही कारवाई करा, मी घाबरणार नसून चुकीच्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहे. मी साहित्यिक असून मला सत्य बोलले पाहिजे. राज्यातील सर्व साहित्यिकांनी सत्य बोलून मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला पाहिजे.” भाजप सोडून कोणालाही मत द्या, भाजपविरोधी पक्ष व संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन माने यांनी केले.
भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाला प्रश्न सुटावेत असे वाटत नाही. स्वातंत्र्याला 75 वर्षे होऊनही या उपेक्षित समाजाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे 37 वर्षानंतर पुन्हा भटक्या विमुक्तांच्या वाड्या वस्त्यावर जावून शोधयात्रा काढावी लागत आहे.
हे प्रश्न सोडवण्यासाठी भटक्या विमुक्त जमाती संघटनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीबरोबर संघटना काम करणार आहे. आघाडीकडे लोकसभेची एक आणि विधानसभेच्या सहा जागा मागणार असल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यातून शोधयात्रेचा शुभारंभ
भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्कांसाठी व लोकशाही संविधानाचा शोध घेण्यासाठी दि. 14 ऑक्टोबरपासून लातूर जिल्ह्यातून शोधयात्रा सुरु करण्यात येणार आहे. दि. 6 डिसेंबर रोजी मुंबई येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. ही शोभायात्रा प्रत्येक जिल्ह्यातून जाणार असून यापूर्वी 1986- 87 मध्ये अशी शोधयात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत आपण सहभागी होणार असून जेवढे शक्य आहे तेवढे आपण यात्रेत चालणार आहोत, अशी माहिती लक्ष्मण माने यांनी दिली.