नाशिक – अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्याबाबत जे विधान केलं ते खरंच आहे. कंगना खरं बोलली. मी तिच्या विधानाचं समर्थन करतो, असं अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांणा उधाण आले होते. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. विक्रम गोखले यांच्या वक्तव्याबद्दल शरद पवार यांना विचारले असता, अशी माणसं असतात समाजात असं म्हणत, त्यांनी गोखले यांच्या विधानाचा एका वाक्यात निकाल लावला आहे.
शरद पवार आज निफाडला आले होते. यावेळी त्यांना विक्रम गोखलेंच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावर, अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी अस मला वाटत नाही. असे लोक असतात समाजात, असं म्हणत शरद पवारांनी गोखलेंच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
काय म्हणाले होते विक्रम गोखले ?
विक्रम गोखले यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना भाजप-शिवसेना युती, कंगना रनौत यांचे वादग्रस्त वक्तव्य यावर भूमिका मांडली. “भीक मागून स्वातंत्र्य मिळालं असं कंगना म्हणालीय. तिच्या या म्हणण्याशी मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य दिलेलं आहे बरं का ? योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना त्यावेळचे मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांनी या योद्ध्यांना वाचवलं नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक त्याकाळी आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी,” असे विक्रम गोखले म्हणाले आहेत.