अमरावती : अजित पवार आमचेच नेते आहेत, ते भाजपसोबत गेले म्हणून पक्षात फूट पडली असे होत नाही, असे म्हणत शरद पवारांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे. काही दिवसांत शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील मोदी सरकारला पाठिंबा देतील, असे धक्कादायक वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमरावतीत माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, वर्षभराच्या कार्यकाळात मोदींच्या नेतृत्वात विश्वकर्मा योजना, ओबीसी घटकांकरता योजना अशा अनेक योजनांवर काम सुरू आहे. गेल्या नऊ वर्षात जे निर्णय घेण्यात आलेले नाही ते निर्णय आम्ही वर्षभरात घेणार आहे. केंद्र सरकारचे हे कम पाहून शरद पवारांचे लवकरच मत आणि मनपरिवर्तन होईल. त्यानंतर अजित पवारांप्रमाणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील, असे म्हटले आहे.
त्यासोबतच अमरावती लोकसभा ही जागा जर भाजपला मिळाली तर खासदार नवनीत राणा यांनी कमळावर निवडणूक लढवावी हा आमचा प्रयत्न असणार आहे, अमरावती लोकसभेत कमळच चिन्ह आले पाहिजे. शेवटी विदर्भात सगळ्यांच्या मेहनतीने भाजप मोठा केला आहे, असे देखील बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आमचेच नेते आहेत, असे म्हटले होते. दरम्यान, त्याच्या या वक्तव्याला शरद पवार यांनी देखील दुजोरा दिला आहे. याविषयी बोलताना शरद पवार यांनी,”ते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे.” असे म्हटले आहे.