ठाणे – महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवा येथील सभेला हजेरी लावली. यावेळी फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
तसेच माझा बाहेरून पाठिंबा आहे, त्यामुळे मी आज काहीही बोलू शकतो. आपल्याला थोडी अजून फेव्हिकॉल लागला आहे, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, सध्या निवडणुकीत लोकांच्या जीवन-मरणाचे, रोजचे जे विषय आहेत त्यावर भाष्य व्हायला हवे होते, पण कशावर निवडणूक चालू आहे? तर वडील चोरले.
फोडाफोडीचं राजकारण मला कधीही मान्य झालं नाही आणि कधी होणारही नाही. पण या सगळ्यात जे आज बोलत आहेत की, आमचा पक्ष फोडला. तुम्ही सर्वजण जे कोणत्या आघाडीत बसला आहात, जरा एकमेकांकडे बघा, आपण काय उद्योग केले आहेत ते.
याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 पैकी 6 नगरसेवक खोके देऊन फोडले होते ना? तेव्हा काही वाटलं नाही? मागितले असते तर मी स्वत: दिले असते, असे म्हणते राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
या फोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्रात कुणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली. 1977-78 साली पुलोदचं सरकार स्थापन झाले.
मग 1991 साली याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडायला लावली. त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचे काम याच शरद पवारांनी केले होते. ज्या छगन भुजबळांना फोडले आज ते येथे असतील, असा टोला त्यांनी लगाविला.