मुंबई – वनमंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवीला दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी पोहरादेवी परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. करोनाचे सर्व निर्बंध धुडकावून लावत उत्साहात असणाऱ्या कार्यकर्त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना किरकोळ लाठीमार करावा लागला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली. मात्र, संजय राठोड यांनी याबद्दल काहीही प्रतिक्रया देण्यास नकार दिला आहे.
मी मंगळवारीच कामावर रुजू झालो आहे. सर्व काही सुरळीत कामकाज सुरू केले आहे. आज कॅबिनेट आहे, त्यासाठी निघालो आहे, असे संजय राठोड म्हणाले आहेत. मुंबईला रवाना होताना राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, शरद पवार यांच्या नाराजीवर विचारले असता संजय राठोड यांनी मी त्यावर काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पोहरादेवी येथील घटनेची गंभीर दाखल घेतली असून माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे स्पष्ट केले होते. कोविडच्या काळात अशा रितीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांना दिल्या.
पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दु:खी आहे. या प्रकरणात घाणेरडे राजकारण केले जात आहे. पूजा चव्हाण या आमच्या समाजातल्या मुलीचा मृत्यू झाला. याचे आम्हाला दु:ख आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असं संजय राठोड म्हणाले.