तिरुवनंतपूरम – स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सात वर्षांची बंदी भोगलेल्या वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याची केरळ रणजी संघात निवड करण्यात आली आहे. एकेकाळी भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून नावारुपाला येत असलेला श्रीसंत 2013 सालच्या आयपीएल स्पर्धेतील एका सामन्यात स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात श्रीसंत दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर सात वर्षांची बंदी लावण्यात आली होती.
37 वर्षाच्या श्रीसंतवर लावण्यात आलेली बंदी येत्या सप्टेंबरअखेर संपूष्टात येत असून त्याची राज्य संघात निवड जाल्याने त्याला रणजी स्पर्धेत खेळता येणार आहे. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घातली होती. पण या प्रकरणी श्रीसंतने न्यायालयीन लढाई लढली.
2018 मध्ये केरळ उच्च न्यायालयाने त्याच्यावरील आजीवन बंदचा बीसीसीआयचा निर्णय रद्द केला. पण 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीसीआयचा निर्णय कायम ठेवला. हा निर्णय देताना न्यायालयाने बीसीसीआयला शिक्षेचा कालावधी कमी करण्यास सांगितले होते. त्यानंतर बीसीसीआयच्या लोकपाल समितीने श्रीसंतच्या शिक्षेचा कालावधी सात वर्ष केला होता.
श्रीसंतने 2005 साली श्रीलंकेविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर पुढील वर्षी त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने 27 कसोटींत 87 तर, 53 एकदिवसीय सामन्यांतून 75 बळी मिळवले आहेत.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकलेल्या 2007 साली झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत तसेच 2011 साली झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत त्याने सरस कामगिरी केली होती. त्यानंतर 2013 साली स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्याने त्याला बंदीला सामोरे जावे लागले होते.
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी 2015 साली श्रीसंत, अंकीत चव्हाण आणि अजित चंदिला यांच्यासह 36 आरोपींची स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पतियाला हाउस कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर देखील श्रीसंतची न्यायालयीन लढाई सुरूच होती.
श्रीसंतने व्यक्त केले आभार
मला संधी दिल्याबद्दल केरळ क्रिकेट असोसिएशनचा आभारी आहे. बंदीच्या कालावधीतही मी स्वतःला तंदुरुस्त ठेवले असून राज्य संघातून पुनरागमन करण्यास उत्सूक असल्याचे श्रीसंतने सांगितले.