कोलंबो – भारतीय क्रिकेट संघाने 2011 साली श्रीलंकेचा पराभव करत विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती. आता याच सामन्याबाबत श्रीलंकेतील माजी क्रीडामंत्र्याने हा सामना फिक्स होता असे धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता जागतिक क्रिकेट वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1983 साली प्रथमच विश्वकरंडक स्पर्धा जिंकून करंडक भारतात आणला होता. त्यानंतर 28 वर्षांनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वकरंडक पुन्हा भारतात आणण्याची अफलातून कामगिरी केली. त्यावेळी हा अंतिम सामना फिक्स होता असा दावा या मंत्र्याने केला असून त्याला अदाप कोणताही पुरावा देता आलेला नाही.
भारतीय क्रिकेटची पंढरी समजल्या जात असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता. हा सामना कोणा खेळाडूने नव्हे तर श्रीलंका क्रिकेटशी संबंधीत काही व्यक्तींनी फिक्स केला होता असेही या मंत्र्याने वर्तवले आहे. सध्यातरी या विधानावर बीसीसीआय व श्रीलंका क्रिकेट मंडळाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.