नवी दिल्ली : चीनमधून परत आलेल्या केरळमधील आणखी सात जणांना केरळमधील आरोग्य सुविधांवर देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यांना नोवेल कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची शक्यता आहे. मात्र आतापर्यंत देशात या विषाणूची लागण झाल्याचे एकही प्रकरण पुढे आलेले नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आज सांगितले.
या सातही व्यक्तींचे नमुने आयसीएमआर- एनआयव्ही, पुणे येथे तपासणीसाठी पाठवून देण्यात आले आहेत. पूर्वी चाचणी केलेल्या इतर चार प्रवाशांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेद्वारे घेतलेली चाचणी निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात 24 बाय 7 चालणारी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 31-11-23978046 असा या हेल्पलाईनचा क्रमांक आहे.
नोवेल कोरोना या विषाणूचा भारतात संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून आतापर्यंत 96 विमानांमधून आलेल्या 20 हजार 844 प्रवाशांची तपासणी केली गेली आहे. प्रवासासाठी जारी केलेली मार्गदर्शक सूचना आता 12 विमानतळांना लागू केली गेली आहे.
राज्य शासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात आहे. गेल्या सात दिवसांत 1 हजार 789 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.
त्यातील 6 जण महाराष्ट्रातील होते. त्यासंदर्भात मुंबईतील दोन प्रवाशांना आजाराची लक्षणे आढळल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
कोरोना विषाणूंचे नमुने तपासण्यासाठी महाराष्ट्रात पुणे येथे असलेली राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संशोधन संस्था सज्ज आहे, तसेच आवश्यकता असेल तर, देशातल्या आणखी दहा तपासणी केंद्रांमध्ये या विषाणूंचे नमुने तपासले जातील असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.