मलठण परीसरातील शेतकरी संतप्त
सविंदणे – मलठण (शिंदेवाडी) येथील कुकडी पाटबंधारे विभागाच्या कालव्यावरील विमोचकाचे लोखंडी गेट तोडून सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे नुकसान करीत पाणी चोरून वापरल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिंभा धरणातून आंबेगाव -शिरूर तालुक्याला आवर्तन सोडले आहे. आधी पाणी शेवटच्या टोकाला सोडले जाते. परंतू आधीच मागील भागाला पाणी सोडले जाते. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी चिरीमिरी घेऊन कुठेही पाणी सोडून देत आहे. मात्र जिथे गरज आहे. तिथे पाणी सोडत नाहीत.
यामुळे परिसरातील शेतकरी हैराण झाले आहे. मग शेतकरी लोखंडीगेट तोडण्याचा प्रकार करत आहे. गेट तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने मलठण परिसरातील शेतकरी पाटबंधारे विभागाच्या विरोधात संतप्त झाले आहे. या प्रकाराला पाटबंधारे विभागाचे कर्मचारी जबाबदार असून नियमानुसार पाणी ते सोडत नाही, असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.
शिंदेवाडी मलठण येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १ नारायणगाव या कालव्यावरील विमोचकाचे बुधवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास चार जणांनी लोखंडी गेट तोडून पाणी चोरून वापरले. याबाबत पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ दमदाटी करण्यात आली.
याबाबत बिनागीर भाऊसाहेब गोसावी (वय ४० रा. मंचर ता. आंबेगाव) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सुरेश पांडुरंग गायकवाड (खाटपे), श्रीकांत सुखदेव वाव्हळ व अन्य दोन अनोळखी व्यक्ती सर्व (रा. मलठण, ता. शिरुर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगत करीत आहेत.
रात्रीस खेळ चाले
रात्रीच्या वेळी पाटबंधारे विभागाचे काही कर्मचारी काही शेतकऱ्यांकडून दारुची, जेवणाची पार्टी करुन , चिरीमिरी घेऊन कुठेही पाणी सोडत असल्याची चर्चा मोठया प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत असून शेवटच्या टोकाला पाणी लवकर पोहोचत नाही. त्यामुळे शेतकरी त्रासले जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज परिसरातील नागरीकांनी व्यक्त केली आहे.