नवी दिल्ली: पाकिस्तानकडून समझोता एक्सप्रेस आपल्या हद्दीत बंद केल्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय हद्दीतही समझोता एक्सप्रेस बंद करण्याची घोषणा रेल्वेच्यावतीने करण्यात आली. समझोता एक्सप्रेस दर आठवड्याला रविवारी दिल्ली ते अटारीपर्यंत आणि तेथून त्याच मार्गाने माघारी येत असे. तर पाकिस्तानकडून ही रेल्वे लाहोर ते अटारी मार्गावर धावत असे. अतारी रेल्वे स्टेशनवर प्रवासी रेल्वे गाडी बदलत असत.
पाकिस्तानने लाहोर आणि अटारी मार्गवर समझोता एक्सप्रेस रद्द केल्यानंतर दिल्ली ते अटारी मार्गावरील रेल्वे गाडीही रद्द करण्यात आली आहे, असे उत्तर रेल्वेचे मुख्य् जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितले. आजच्या समझोता एक्सप्रेससाठी केवळ दोनच प्रवाशांनी तिकीटे काढली होती.
केंद्र सरकारने 370 कलम रद्द केल्यापासून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानने समझोता एक्सप्रेसबरोबर थार एक्सप्रेसही रद्द केली आहे.