दियाकुमारी यांनी कोर्टात पुरावा सादर करण्याची दर्शवली तयारी
जयपुर: अयोध्या प्रकरणात सध्या सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीच्यावेळी एकदा न्यायालयाने रामाच्या रघुवंशाचे कोणी वारस अयोध्या परिसरात नाहीत काय अशी विचारणा उपस्थित वकिलांकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राजस्थानातील राजसमंद येथील विद्यमान खासदार दियाकुमारी यांनी आपले घराणे थेट रामाचे वंशज असल्याचा दावा केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की रामाचे पुत्र कुश यांच्या घराण्याचेच आम्ही वारस आहोत. रामाचे वंशज केवळ अयोध्येत नाहीत तर संपुर्ण जगात आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. रामाचे वंशज कोठे आहेत असा सवाल सुप्रिम कोर्टाने केला आहे. पण आम्हींच या रघुवंशाचे वारस आहोत. त्यासंबंधी काही हस्तलिखीते आणि वंशावळीची काही कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत.आवश्यकतेनुसार कोर्टात ही कागपत्रे सादर करण्यास आम्ही तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
अयोध्या प्रकरणात ज्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्या खटल्यात रामलल्ला विराजमान या वादीतर्फे के पराशरन हे कोर्टात बाजू मांडत आहेत. नुकत्याच झालेल्या एका सुनावणीच्यावेळी सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी पराशरन यांना रघुवंशांचे कोणी वारसदार अयोध्य परिसरात नाहीत काय? असा प्रश्न विचारला होता. त्यावर पराशरन यांनी आपल्याला याची कल्पना नाही, माहिती घेऊन सांगतो असे उत्तर देऊन वेळ निभावून नेली होती.
या पार्श्वभूमीवर दियाकुमारी यांनी म्हटले आहे की प्रत्येकाचाच रामावर विश्वास आणि श्रद्धा आहे. गरज भासली तर आम्ही कोर्टात जाऊन आम्हीच कुश यांचे वारसदार आहोत, पर्यायाने आम्ही रघुवंशीय आहोत हे सिद्ध करण्यास तयार आहोत. तथापी सध्याच्या घडीला कोर्टाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा आमचा कोणताही इरादा नाही, मात्र वेळ पडल्यास आम्ही कागदोपत्री हा दावा करू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. दियाकुमारी या जयपुरच्या राजघराण्याशी संबंधीत आहेत आणि त्या भाजपच्या विद्यमान लोकसभा सदस्यही आहेत.