सातारा – महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील अनाधिकृत बांधकामे सरसकट पाडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने महाबळेश्वर तालुक्यात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी महाबळेश्वर व पाचगणीतील बांधकामे सरसकट पाडण्यापूर्वी याबाबतची निश्चित पॉलिसी ठरवावी, भूमिपुत्रांवर अन्याय न करता सस्टेनेबल डेव्हलपमेंट तत्व अंमलात आणावे, अशी मागणी केली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रीतम कळकसकर यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना याबाबत निवदेन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, भारतातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आणि पांचगणी परिसर इको सेन्सेटीव झोनमध्ये समाविष्ट आहे. याठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी अनाधिकृत बांधकामांना आवर घालणे आणि पर्यावरण पूरक उपाययोजना करणे हे नक्कीच आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने आपण महाबळेश्वर तहसिलदार यांना अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे तसेच त्यांचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिलेले आहेत. आपली ही कृती निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, याबाबतचे धोरणात्मक नियमावली किंवा निकष आपण ठरविलेले आहेत किंवा नाही याचा बोध होत नाही. एकूणच साधक बाधक विचार न होता सरसकट बांधकामे पाडण्याबाबत आपण आदेश दिले आहेत असा सूर येथील नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
पिढयान पिढया राहणाऱ्या कुटुंबांच्या तसेच स्थानिक भुमिपूत्र असलेल्या कुटुंबांच्या सध्याच्या बांधकामाला संरक्षण देणे आवश्यक आहे. धनधांडग्यांनी कवडीमोल दराने जागा घेवून ज्यांनी बढेजाव निर्माण करण्यासाठी अलिशान बांधकामे केली आहेत ती निश्चितच हटवण्यात आली पाहिजेत. मात्र, त्याचबरोबरीने हातावरचे पोट असणारे, स्थानिक रोजगार मिळवणाऱ्यांच्या गरजेपुरते उभे केलेल्या बांधकामांना संरक्षण देणेही तितकेच आवश्यक आहे. अतिक्रमणे पाडण्याचा आदेश तात्पुरता थांबवून या विषयावर सर्व लोकप्रतिनिधींची आपण बैठक बोलवावी. निश्चयात्मक धोरणात्मक निर्णय घेवून, तसेच कोणते अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे याचे निकष ठरवावेत, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी केली आहे.