समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून नेत्यांच्या बैठकांचा “सिलसिला’ सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊनही आघाडी-युतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यातच काही नेते जगताप व नागवडे या दोन्ही गटांशी बैठका करीत असल्याने गोंधळात भर पडली आहे.
तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या अठरा जागांसाठी 28 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आजपासून (दि.27) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. राज्य बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी कधी पाचपुते तर जगताप-नागवडेंची मदत घेत गेल्या 15 वर्षांपासून बाजार समितीवर वर्चस्व राखले आहे. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत झालेल्या पाडापाडीमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे आता माजी आमदार राहुल जगताप आणि काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांना या निवडणुकीत एकत्र आणून पुन्हा सत्ता मिळवण्याची नाहाटांची “स्ट्रॅटेजी’ दिसते. त्याच पार्श्वभूमीवर नाहाटा यांनी दोन दिवसांपूर्वी राहुल जगताप आणि साजन पाचपुते यांची बैठक घडवून आणली. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसला तरी प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.
एकीकडे राष्ट्रवादीने साजन पाचपुतेंना बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरू केले असताना दुसरीकडे कॉंग्रेस आणि भाजपच्या युतीच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज(दि.27) सकाळी आमदार बबनराव पाचपुते आणि नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्यात शहरात बैठक पार पडली. या बैठकीत आ. पाचपुते आणि नागवडे गटाच्या युतीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. एकीकडे आ.पाचपुते आणि भोस यांची बैठक होत असताना दुसरीकडे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि साजन पाचपुते यांच्यातही आज बैठक झाली.
या बैठकीचा तपशील समजू शकला नाही, मात्र, साजन पाचपुते हे जगताप आणि नागवडे अशा दोन्ही गटांच्या संपर्कात असल्याने त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याचे दिसते. आ. पाचपुते आणि नागवडे गटाची युती झाल्यास काष्टीचे सरपंच साजन पाचपुते आणि नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर हे या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच, खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत झालेले पाडापाडीचे राजकारण आणि पक्षीय अथवा आघाडीचे संकेत डावलून नेतेमंडळींच्या सुरू असलेल्या बैठका विचारात घेता बाजार समिती निवडणुकीत नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.