नवी दिल्ली- अयोध्येत राम मंदिर होणार हे नियतीने अगोदरच ठरवले होते. आज आता हे मंदिर झाले असताना आपल्याला अटल बिहारी वाजपेयी यांची उणीव भासते आहे अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केली आहे.
९० च्या दशकांत जेंव्हा रामजन्मभूमी आंदोलन सुरू झाले तेंव्हा लालकृष्ण आडवाणी हेच त्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा होता आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच पहिली रथयात्रा सुरू झाली होती. आडवाणींच्या रथयात्रेने देशाचे राजकारण केवळ ढवळून निघाले नाही तर त्याने निर्णायक बदलही घेतला. भाजपची संसदेतील ताकद त्यानंतर वाढतच गेली. अगोदर मित्रपक्षांच्या पाठिंब्याने तर आता पूर्ण स्वबळावर हा पक्ष सत्तेत आला. आता राम मंदिराचे काम जवळपास पूर्ण होत आले असताना आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आडवाणी यांना निमंत्रण मिळाले असताना त्यांनी एका लेखाच्या माध्यामातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रधर्म या हिंदी माध्यमासाठी लिहिलेल्या लेखात आडवाणी यांनी आता यावेळी आपल्याला वाजपेयी यांचे स्मरण होत असल्याचे नमूद केले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात नरेंद्र मोदी प्रत्येक भारतीयाचे प्रतिनिधित्व करतील असेही त्यांनी म्हटले आहे. हे मंदिर सर्व भारतीयांना प्रभू श्रीरामाचे गुण अंगिकारण्यासाठी प्रेरीत करेल अशी आपली अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
रथयात्रेच्या काळात असे अनेक अनुभव आलेत की त्यांनी माझ्या आयुष्याला प्रेरणा दिली. त्यावेळी दूर दूरच्या गावांमधील लोक रथ पाहिल्यानंतर अत्यंत भावूक होत माझ्याकडे येत असत. ते रामाचा जयजयकार करत, प्रणाम करत. संपूर्ण देशभरात राम मंदिराचे स्वप्न पाहणारे असंख्य जण असल्याचा हा पुरावा होता. ही मंडळी आपली श्रध्दा लपवून उदासपणे जिवन कंठत होती. आता २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर त्यांची अभिलाषा पूर्ण होणार आहे.