अयोध्या: अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राममंदिर उभारणी चळवळीचे प्रणेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. पाच ऑगस्टला होणाऱ्या या सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती देवस्थान न्यासाच्याविश्वस्तांनी दिली.
याशिवाय सर्व पंथांच्या आध्यात्मिक महानुभावांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, करोनाच्या सथीमुळे मर्यादित निमंत्रितांसाठी हा कार्यक्रम होणार आहे. केवळ 200 जणांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. याबाबतची यादी अद्याप अंतिम झाली नसली तरी रामजन्मभूमी मंदिर चळवळीतील अग्रणी व्यक्तींचा त्यात समाचेश आहे.
सरसंघचालक मोहन भागवत, संघाचे सरचिटणीस सुरेश उर्फ भय्याजी जोशी, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांचाही निमंत्रितांमध्ये समावेश आहे, असे अन्य एक विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी सांगितले. रामंदिर उभारणीची सुरुवात करण्यासाठी आयोजित भूमिपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देतील, अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
या भूमिपूजनासाठी अनेक महत्त्वाचे बुद्धविहार, गुरूद्वार आणि जैनमंदिरांसह अनेक ठिकाणांहून माती आणण्यात येत आहे.
या भूमिपूजन सोहळ्यासाठी मृदासंकलानाची जबाबदारी विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ते म्हणाले, जैन मंदिर, वाल्मिकी मंदिर आणि गुरूद्वारातील माती अयोध्येला पाठवण्यात आली आहे. एकदा करोनाची साथ संपली की विहिंप मंदिर उभारणीसाठी देशव्यापी मोहीम राबविणार आहे. त्यात दहा कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल.
हा भूमिपूजन कार्यक्रम म्हणजे शतकानुशतकात एखादा होणारा सोहळा असे वर्णन करून अलोक कुमार म्हणाले, दीर्घकालीन न्यायलयीन लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला न्यासाला मंदिर उभारणीची परवानगी दिली.
घरातच आनंदोत्सव करा
हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा सोहळा आहे. त्यामुळे याचे प्रक्षेपण दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून केले जाईल, अशी माहिती न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. रामभक्तांनी अयोध्येला येण्याऐवजी त्यांनी आपापल्या घरात किंवा जवळपासच्या मंदिरात याचा आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.