मुंबई: ज्येष्ठ क्रिकेटपटू व संघटक माधवराव आपटे यांचे सोमवारी येथे ह्रदयविकाराने निधन झाले. निधनासमयी ते 86 वर्षांचे होते. आपटे यांनी भारताकडून सात कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करताना 542 धावांची नोंद केली. त्यामध्ये त्यांनी एक शतक व तीन अर्धशतके अशी कामगिरी केली. त्यामध्ये नाबाद 164 धावा ही त्यांची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी होती.
पाकिस्तानविरूद्ध 1952 मध्ये त्यांनी येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) मैदानावर कसोटी पदार्पण केले. या सामन्यात त्यांनी 30 व नाबाद 10 धावा केल्या. 1953 मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात 460 धावा केल्या. एकाच कसोटी मालिकेत 400 पेक्षा जास्त धावा करणारे ते भारताचे पहिले सलामीवीर होते. विनू मंकड यांच्या समवेत सलामीस खेळण्याची त्यांना संधी मिळाली. किंग्जस्टन येथे 1953 मध्येच ते अखेरचा कसोटी सामना खेळले.
प्रथम दर्जाच्या 67 सामन्यांमध्ये त्यांनी 3 हजार 336 धावा केल्या. त्यामध्ये त्यांनी 6 शतके व 16 अर्धशतके नोंदविली. मुंबईकडून पॉली उम्रीगर, विजय हजारे, रुसी मोदी आदी नामांकित खेळाडूंसमवेत खेळण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी स्थानिक सामन्यांमध्ये मुंबई संघाचे नेतृत्वही केले. त्यांनी सीसीआयचे अध्यक्ष म्हणून काम करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या स्थापनेत व विकासात महत्त्वाचा वाटा उचलला. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या गौरव होण्यासाठी कार्यरत असलेल्या लीजंड्स क्लबचेही ते अध्यक्ष होते. 1983 मध्ये त्यांची मुंबईचे शेरीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
सर ब्रॅडमन यांचे सरासरीचे शतक हुकले
ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन हे श्रेष्ठ फलंदाज होते. द ओव्हल मैदानावर 1948 मध्ये झालेल्या सामन्यात आपटे यांनी त्यांना शून्यावर बाद केले. त्यामुळेच त्यांना सरासरीचे शतक पूर्ण करता आले नाही. ्