नवी दिल्ली – संदेशखळी प्रकरणाची सीबीआय किंवा एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सोमवारी (४ मार्च) सुनावणी होणार असल्याचे कोलकता उच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. संदेशखळी येथील महिलांनी टीएमसी नेत्यांवर केलेल्या लैंगिक छळ आणि आदिवासींकडून जमीन हिसकावल्याच्या आरोपांची उच्च न्यायालयाने यापूर्वीच दखल घेतली आहे.
याचिकाकर्ते वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी न्यायालयाला विनंती केली की या जनहित याचिकेवर न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन सुनावणी करावी. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवगनम यांच्या विभागीय खंडपीठाने सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे सांगितले. या खंडपीठातील दुसरे न्यायमूर्ती हिरणमय भट्टाचार्य यांनी याचिकाकर्त्याला या प्रकरणातील याचिकाकर्त्यांना नोटीस बजावण्यास सांगितले.
या याचिकेत वकील श्रीवास्तव यांनी संदेशखळी प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा पश्चिम बंगालबाहेरील विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) करावा अशी मागणी केली होती.
उच्च न्यायालयाच्या तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी जनहित याचिकांवर सुनावणी करण्यास नकार दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने श्रीवास्तव यांना कोलकता उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली होती.