संजय जगताप : हिवरे, चांबळी, बोपगाव आदी गावांत प्रचार दौरा
सासवड- पुरंदर तालुक्याचा एका भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो, तर दुसऱ्या भागात दुष्काळाचा सामना करीत पिण्याच्या पाण्यासाठी या भागातील महिलांना मैलोनमैल वणवण करावी लागते. जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री म्हणवणाऱ्या लोकप्रतिनींच्या तालुक्यातील मतदार उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी कासावीस होतात, अशा या मंत्र्यांना पुन्हा एकदा मुंबईला पाठवण्याची वेळ झाली, असल्याची टीका पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी केली.
पुरंदर-हवेली मतदारसंघातील महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांचा हिवरे, चांबळी, बोपगाव, भिवरी, आस्करवाडी, कोडीत या गावात प्रचार दौरा पार पडला, त्यावेळी जगताप यांनी विजय शिवतारे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. यावेळी कार्यकर्ते व मतदार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
संजय जगताप म्हणाले की, पुरंदर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पाण्यासाठी आसुसलेल्या पुरंदरकरवासियांना गुंजवणीचे गाजर दाखवून आमदारांनी पहिल्यांदा आमदार की पदरात पाडली त्यावेळी ते म्हटले की मी विरोधात आहे माझी सत्ता नाही दुसऱ्या मिळालेल्या संधीच्या वेळी सुदैवाने त्यांना जलसंपदा व जलसंधारण खाते मिळाले मात्र गुंजवणीचे एका स्वाक्षरीवर काढलेले पाणी अजूनही त्यांना आणता आले नाही, असे त्यांनी नमूद केले.