लातूर – राज्यातील शेतीचे आरोग्य नको त्या मात्रामुळे खराब झाले असून कर्बचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषी विभाग आता माती परीक्षणावर भर देणार आहे. यासाठी पोस्ट ऑफिसची मदत घेतली जाणार आहे. (soil for testing) तालुका स्तरापर्यंत माती परीक्षण केंद्रे अद्ययावत करून माती परीक्षणासाठी आता शेतकरी आपल्या मातीचा बॉक्स माती परीक्षण केंद्राचा पत्ता टाकून त्यावर त्याच्या मोबाईल नंबरसह सविस्तर माहिती देईल. मातीचे परीक्षण होऊन सात दिवसांच्या आत शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर मातीच्या आरोग्याचा अहवाल येईल, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिली आहे.
लातूरमधील लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. धनंजय मुंडे म्हणाले, राज्यात दिवसेंदिवस शेती पिकण्यासाठी आवश्यक असलेले कर्ब कमी होत आहे. हे असेच राहिल्यास जमिनी उपजावू राहणार नाहीत. हे कर्ब वाढविण्यासाठी आता कृषी विभाग पुढाकार घेणार आहे. यापुढे माती परीक्षण करताना मातीची कोणत्या पिकासाठी योग्यता आहे, कोणत्या पिकासाठी नाही, कोणत्या पिकामुळे मातीचे कर्ब वाढेल या सर्व गोष्टी सांगितल्या जातील, अशी माहिती त्यांनी यावेळी सांगितली. (Dhananjay Munde)
तसेच बांबू हे पिक मातीचे आरोग्य वाढविणारे आहे. यासाठी लातूर आणि सातारा येथे प्रायोगिक तत्वावर होणारी बांबू लागवड आता बीडमध्येही केली जाणार आहे. तीन बाय सहाचा खड्डा आणि त्यात लागणारे बांबूच्या रोपासाठी प्रत्येकी पन्नास रुपये अनुदान दिले जाणार आहे.(Good news for farmer)
बांबूसाठी आता हेक्टरी सात लाख रुपये दिले जाणार असून, राज्यात फळबागांसाठी मनरेगातून जसे अनुदान दिले जाते तसे सर्व जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले.