पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसला जितक्या जागा मिळायला हव्यात, त्या मिळण्यासाठी दोन्ही मित्रपक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे; परंतु आता काही जण कारण नसताना राष्ट्रवादी काँग्रेसला जागा वाटपात फक्त तीन जागा मिळाल्या, असा गैरसमज पसरवत आहेत. महायुतीत कोणतेही गैरसमज नसल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला.
याप्रसंगी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी २८ तारखेनंतर जाहीर करणार असल्याचे पवार यांनी सांगितले असले, तरी रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना उमदेवारी देण्यात आली असल्याची घोषणा या वेळी पवार यांनी केली, तसेच धनंजय मुंडे यांच्याकडे प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की मागील लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीत निवडणुका लढलो होतो, तर शिवसेना आणि भाजप एकत्र लढले. त्या वेळी भाजपच्या २३ आणि शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, काँग्रेस १ आणि आम्ही पुरस्कृत केलेल्या नवनीत राणा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून एक जागा जिंकली होती.
आमच्या मित्रपक्षांची इतकीच भूमिका आहे, की भाजपने २३ जागा जिंकल्या, शिवसेनेने १८ जागा जिंकल्या. या जागा त्यांना मिळाव्यात. यावर आता चर्चा करून मार्ग काढला जाणार असून, महायुतीत कोणताही गैरसमज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.