नवी दिल्ली: केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरात अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 765 जणांना अटक केली आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली. 5 ऑगस्ट नंतर जम्मू काश्मीरात दगडफेकीचे प्रमाण कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले की या वर्षी 5 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर पर्यंत दगडफेकीच्या 190 घटना तेथे घडल्या. त्यातील 765 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
काश्मीरातील दगडफेकीच्या घटनांवर नियंत्रण यावे यासाठी सरकारने अनेक पदरी उपाययोजना केली आहे. अनेकांची धरपकडही केली जात आहे. त्यामुळे हा प्रकार आता कमी होऊ लागला आहे असे ते म्हणाले. या प्रकारामागे हुर्रियत नेत्यांची आणि अन्य फुटीरवादी संघटनांची फूस असल्याचे आढळून आले असून यात एनआयएलाही लक्ष घालण्यास सांगण्यात आले आहे. दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी एकूण 18 केसेस दाखल केल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की गेल्या सहा महिन्यात जम्मू काश्मीरात एकूण 34 लाख 10 हजार 219 पर्यटकांनी भेट दिली. त्यात 12934 जण विदेशी होते. या पर्यटनामधून सरकारला 25 कोटी 12 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे अशी माहितीही त्यांनी दिली.