पुणे – यजमान भारत व श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या (गुरुवार) पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर होणार आहे. पहिला सामना जिंकलेला भारतीय संघ या सामन्यातील विजयासह मालिकाही जिंकण्यासाठी सज्ज बनला आहे. मुंबईत मंगळवारी झालेला पहिला टी-20 सामना भारतीय संघाने अवघ्या 2 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.
आता हा सामनाही जिंकून तिसऱ्या सामन्यापूर्वीच मालिका खिशात टाकण्याची भारताला संधी आहे. नवोदित कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला सामना जिंकला असला तरीही काही प्रश्न निर्माण झाले आहेत. सलामीवीर म्हणून पदार्पण केलेल्या शुभमन गिलसह सूर्यकुमार यादव, स्वतः कर्णधार पंड्या यांना जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे.
गोलंदाजीबाबत बोलायचे झाले तर पदार्पण केलेला वेगवान गोलंदाज शिवम मावी सरस ठरला असला तरीही उमरान मलिक, हर्षल पटेल व फिरकी गोलंदाज अक्सर पटेल यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. पटेलने फलंदाजी व गोलंदाजीत चुणूक दाखवली असली तरीही त्यात सातत्य राखावे लागणार आहे. तसेच श्रीलंकेची खोलवर असलेली फलंदाजी पाहता पहिल्या सामन्यातील 162 ही धावसंख्याही अपुरी ठरणार असे चित्र होते.
दुसरीकडे श्रीलंका संघालाही प्रमुख फलंदाजांच्या अपयशाने सतावले आहे. कुशल मेंडीस, कर्णधार दासुन शनाका व चामिका करुणारत्ने वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांना आता क्षमतेपेक्षाही जास्त सरस कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाजीतही वनिंदू हसरंगा वगळता अन्य गोलंदाजांनी साफ निराशा केली आहे. हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्यासाठी त्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे.
गिलच्या कामगिरीवर लक्ष
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याने पहिल्या सामन्यात टी-20 संघात पदार्पण केले मात्र, त्याला मोठी खेळी करता आली नाही. आता या सामन्यात मात्र, त्याच्या कामगिरीकडे लक्ष राहणार आहे. या मालिकेत त्याला मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले तरच त्याचे भारताच्या टी-20 संघातल स्थान निश्चित होणार आहे.