भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून येथील पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिदादला (Thursday 20 July; 07:30 PM IST) प्रारंभ होत आहे. पहिली कसोटी डावाने जिंकली असल्याने आता भारतीय संघ मालिकेत सुरक्षित आहे. त्यामुळे आता या कसोटीत संघात बदल करत सेकंड बेंचला संधी दिली गेली पाहिजे.
संघासाठी आम्ही रोटेशन पॉलिसी राबवू, असे थाटात राहुल द्रविड व रोहित शर्मा म्हणाले होते. ते त्यांनी खरे करून दाखवावे, अन्यथा मालिका जिंकण्याच्या नादात बोलाचीच कढी व बोलाचाच भात हेच सिद्ध होईल.
संघात ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अक्सर पटेल व श्रीकर भरत हे सेकंड बेंच म्हणून आहेत, पर्यटक म्हणून नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण या सामन्यानंतर या दोन्ही संघांत एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. पण या नवोदित खेळाडूंना कसोटीत संधी दिली नाही व मर्यादित षटकांच्याच सामन्यात खेळवले गेले तर भविष्यातील कसोटी संघ तयार कसा होणार.
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
पुढील काळात भारतीय संघ आयर्लंड, आशिया करंडक, एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक, ऑस्ट्रेलियाविरुद्धचे एकदिवसीय सामने असा व्यस्त राहणार आहे. त्यात ऋतुराज आणि कंपनीला खेळविले गेले तरीही त्याने समाधान होणार नाही. ज्या खेळाडूंना कसोटीसाठी राखीव म्हणून घेतले गेले आहे त्यांना कसोटीतच प्राधान्याने खेळवले गेले पाहिजे.
त्यांचा वेळ जात नाही म्हणून त्यांना वेस्ट इंडीजला घेऊन गेलेले नाही ना, मग खेळवा त्यांना कसोटीत. काय होणार आहे, वेस्ट इंडीजचाही संघ तर संघबांधणीतूनच जात आहे. फारतर भारतीय सघ पराभूत होईल असे म्हणू. पण त्यातून हे खेळाडू शिकतील, अनुभव घेतील व तेच पुढील काळात भारताला एक भक्कम संघ बनवतील.
यशस्वी जयस्वालने स्वतःला सिद्ध केले आहे. आता ऋतुराजलाही ती संधी मिळावी. रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकाला विश्रांती देत पटेलला खेळवावे. जयदेव उनाडकटच्या जागी मुकेश कुमार किंवा नवदीपला संघात स्थान द्यावे, तरच ते खरे रोटेशन ठरेल. प्रत्येक मालिकेत सेफ गेम खेळून उपयोग नसतो, हे कधी लक्षात येणार.