पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) संशयास्पद “ओएमआर’ शीटची पुणे पोलिसांनी कसून तपासणी सुरू केली आहे. यामुळे “टीईटी’ परीक्षेतील घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याचीच शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.
“टीईटी’ च्या निकालात गडबडी करुन नापास झालेल्या उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आले. या प्रकरणात परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, जी.ए.सॉफ्टवेअर अँड टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक अश्विन कुमार, डॉ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक सौरभ त्रिपाठी, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्यासह काही जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
पोलिसांनी परीक्षा परिषदेतील “टीईटी’ परीक्षांची सर्व रजिस्टर, पेनड्राइव्हमधील सर्व डेटा ताब्यात घेतला होता. याची सखोल पडताळणी पोलिसांनी केली. छापासत्रात आरोपींकडे उमेदवारांच्या याद्याही सापडलेल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचे घबाडही सापडले आहे.
यापाठोपाठ आता पोलिसांनी “टीईटी’तील संशयास्पद असलेल्या सुमारे 1,500 “ओएमआर’ शीट तपासणीचे काम हाती घेतले आहे. परीक्षा परिषदेतील बारा अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून हे तपासणीचे कामकाज करुन घेण्यास तीन दिवसांपासून सुरुवातही झालेली आहे. “ओएमआर’ शीट बारकाईने तपासणीसाठी आणखी खूप वेळ लागणार आहे.
एका तासात चार-पाच शीट तपासून होत आहेत. “ओएमआर’ शीटमध्ये गडबडी झाल्याची धक्कादायक बाब उघड होण्याचीच अधिक शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.
विश्वासार्हतेबाबतच प्रश्नचिन्ह
परीक्षा परिषदेमार्फत परीक्षा घेतल्यानंतर संबंधित खासगी एजन्सीच्या यंत्रणेद्वारे “ओएमआर’ शीटचे स्कॅनिंग करण्यात येत असते. काही शीटची मॅन्युअली तपासणी करण्यात येत. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येत असतात. “ओएमआर’ शीट स्कॅनिंग करतेवेळीच मोठे फेरफार झाले असल्याचे काही अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे. परीक्षा परिषदेच्या विश्वासार्हतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.