नवी दिल्ली :गुजरात विधानसभा निवडणूक आणि दिल्ली महापालिका निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात आहे, असा गंभीर आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपावर केला आहे. एवढेच नाही तर दिल्लीतील भाजपा खासदार मनोज तिवारी हेदखील या कटात सामील असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, सिसोदियांच्या या गंभीर आरोपांवर भाजपकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी सिसोदिया यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
मनोज तिवारींनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी, “मी काल अरविंद केजरीवालांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. मला तर वाटतं की ते सुरक्षित रहावेत. ज्याप्रकारे त्यांचे आमदार मार खात आहेत. ज्याप्रकारे त्यांच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. ही सर्व परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. आमचं ट्वीट वाचा आम्ही काय लिहिलं आहे. ही जी हत्या आणि हत्येच्या धमकीची स्क्रीप्ट आहे, ही आम आदमी पार्टीची फार जुनी स्क्रीप्ट आहे.”असे म्हणत आपवरच हल्लाबोल केला आहे.
साल बदल जाते हैं पर इनके आरोप नहीं बदलते-श्री @ManojTiwariMP #AAPProtectsCorruption pic.twitter.com/qpOn7I4rar
— BJP Delhi (@BJP4Delhi) November 25, 2022
याचबरोबर तिवारींनी सिसोदियांच्या ट्वीटची प्रत दाखवत,“भाजपा केजरीवालची हत्या घडवू इच्छिते असे यामध्ये आहे आणि हे २०१९ चे ट्वीट आहे. म्हणजेच हा आरोप दरवर्षी केला जातो, केवळ वर्ष बदलतं मात्र यांचा आरोप तोच राहतो. ”याशिवाय “आम्हाला सजमत नाही की अरविंद केजरीवाल वारंवार मनीष सिसोदीयांना तुरुंगात टाकण्याचं बोलत राहतात आणि मनीष सिसोदीया केजरीवालांच्या हत्येची भविष्यवाणी करत आहेत. त्या दोघांचे आपसात काय सुरू आहे, हे आम्हाला समजण्यापलीकडे आहे.” असे देखील तिवारी यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, मनीष सिसोदिया यांनी काल पत्रकार परिषद घेत, “मनोज तिवारींनी केजरीवाल यांना धमकी दिली आहे. या धमकीमुळे स्पष्ट झाले आहे की, “भाजपा अरविंद केजरीवालांची हत्या करण्याचा कट रचत आहे. षडयंत्रात अडकवण्याच्या कटात भाजपा यशस्वी होऊ शकली नाही, यामुळे आता असा कट रचत आहे. मनोज तिवारींना कसं माहिती की केजरीवालांवर हल्ला होऊ शकतो? या संपूर्ण प्रकरणाची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करू आणि मागणी करू की हत्येची धमकी देण्यासाठी मनोज तिवारींना अटक केली जावी.”अशी मागणी केली होती.