पणजी : इफ्फी महोत्सवात आज ‘दि नेचर इन फोकस सेगमेंट’ मधील चित्रपटकर्ते पी शेषाद्री, डॉ. बिजू दामोदरन आणि आदिनाथ कोठारे यांनी ‘इन कॉन्वर्सेशन’ सत्रात आपले विचार मांडले.
अनेक सामाजिक मुद्यांवर चित्रपटांच्या माध्यमातून जागृती करता येते, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते पी. शेषाद्री यांनी व्यक्त केले. माणसाविषयी सहानुभूती असेल तर मानवी जीवन निसर्गापेक्षा फार वेगळे नाही, असे डॉ. बिजूकुमार दामोदरन यांनी सांगितले. दामोदरन यांचा आधीचा एक चित्रपट, किटकनाशकांमुळे मुलांवर होणाऱ्या परिणामांवर आधारित आहे.
आदिनाथ कोठारे यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेल्या आपल्या आगामी ‘पाणी’ या चित्रपटाविषयी सांगितले. मुंबईसारख्या महानगरांमध्ये लोक गावांमधल्या पाणीटंचाईबद्दल अनभिज्ञ असतात, असे कोठारे यांनी सांगितले. 45 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या गावात कुठलीही सुविधा नसताना केलेल्या चित्रीकरणाचे अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.
या चित्रपटांसाठी वितरणाच्या संधी फारशा उपलब्ध नाहीत, असे शेषाद्री यांनी सांगितले. आता नेटा फ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम यांच्या पुढाकारामुळे खर्च निघू शकत आहे. मात्र सरकारकडून अधिक प्रोत्साहनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य माणसांनीही हे चित्रपट पाहावेत आणि आपली सामाजिक जबाबदारी निभवावी, असे ते म्हणाले.