पिंपरी -आयटी क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या घटना घडताना दिसून येत आहेत. आयटीयन्सचा आग्रह वर्क फ्रॉम होमचा आहे तर कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवू इच्छित आहेत.
याच दरम्यान काही आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत बदल करुन थेट एचआरए (हाऊस रेंट अलाउंस)ला कात्री लावली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात झाली असून प्राप्तीकरात मिळणारी सवलत देखील कमी होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार आयटीयन्सच्या संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
करोनाने देशात प्रवेश केल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात आयटी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम द्वारे काम सुरू ठेवले. आता कोविडचा प्रकोप कमी झाल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर यावे, अशी कंपन्यांची अपेक्षा आहे तर अजूनही धोका पूर्णपणे टळला नसल्याने कर्मचारी घरूनच काम करण्यासाठी आग्रही आहेत. वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यानंतर अनेक कर्मचारी आपपल्या गावी गेले आणि तिथून काम करू लागले.
परंतु अनेक कर्मचारी शहरातच आहेत. काही कंपन्यांनी मात्र कर्मचाऱ्यांच्या एचआरए मध्ये कपात करुन टियर 2 आणि टियर 3 नुसार एचआरए देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार तर कमी झालेच आहेत, परंतु प्राप्तीकरात एचआरए अंतर्गत मिळणारी सवलत देखील घटणार आहे. हे प्रकार तातडीने थांबवावे, अशी मागणी नॅसेंट इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉइज सिनेट या आयटीयन्सच्या संघटनेने केली आहे.
नॅसेंटने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कंपन्यांनी पगाराची रचना बदलून एचआरए कमी केल्याने पगार तर कमी झालाच आहे, सोबतच प्राप्तीकर कायद्याच्या एचआरए संदर्भातील तरतुदींनुसार मिळणारी कपातही घटणार आहे.
अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या एचआरएमध्ये कपात केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच वीज बिल, इंटरनेट खर्चाचा भार कर्मचाऱ्यांवर टाकत आहेत. काही कर्मचारी आपल्या मूळ गावी गेले असल्याने कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना शहराऐवजी त्यांच्या मूळगावानुसार एचआरए देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे
– हरप्रीत सलूजा, अध्यक्ष, नॅसेंट इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉइज सिनेट.