डॉ. मेघश्री दळवी
वर्ष संपता संपता त्याचा आढावा आपण अनेक प्रकारे घेत असतो. हे सरतं 2019 वर्ष हे जोडीने 2010-2019 या एका दशकाचा शेवट आहे. हे दशक अनेक उत्तमोत्तम गोष्टींसाठी गाजलं आहे. मात्र हे दशक आणखी एका दुर्दैवी कारणाने लक्षात राहाणार आहे. आजवरच्या तापमानाच्या नोंदींनुसार हे सर्वाधिक उष्ण दशक ठरलं आहे. आपल्याकडे 1850 पासूनच्या हवामानाचे लिखित रेकॉर्डस उपलब्ध आहेत. त्यातलं सर्वाधिक उष्ण वर्ष आहे 2016, त्याखाली बहुधा 2019 चा क्रमांक लागेल. अतिउष्ण अशा एकूण दहा वर्षांचा क्रम लावला तर त्यातली आठ वर्षं या दशकातली आहेत. उष्णतेची लाट, पारा पंचेचाळीसच्या वर, अशा बातम्यांचं आता नावीन्य वाटेनासं झालं आहे.
याच दशकात हवामान बदलाच्या प्रखर झळा जगातल्या बहुतेक सर्व देशांनी अनुभवल्या. जुलै 2019 मध्ये युरोपमध्ये उष्माघाताने विक्रम केला, तर ऑगस्ट 2019 मध्ये आइसलॅंडमध्ये ओके ग्लेशियरच्या अंताचा दुखवटा पाळावा लागला. उत्तर ध्रुवाचं तापमान बावीस अंश सेल्सियस इतकं उच्च असेल, तर बाकीच्या प्रदेशांचं काय होईल? दोन वर्षांपूर्वी 2017 मध्ये अमेरिकेत वादळांनी हैदोस घातला. निसर्गाचं तांडव फिलिपाईन्ससारखे बेटांना नवीन नाही, पण या दशकात त्यांना निसर्गाचा प्रकोप अनेक वेळा सहन करावा लागला. अवकाळी पाऊस, प्रचंड दुष्काळ, आणि पिकांची नासाडी यात सारे भरडून निघत आहोत. जागतिक हवामानशास्त्र संस्थेच्या अहवालानुसार एकट्या 2019 मध्ये जगभरात दोन कोटींहून अधिक लोकांना बदलत्या हवामानामुळे विस्थापित व्हावं लागलं आहे.
औद्योगिक क्रांती होण्याआधी जगाचं जे सरासरी तापमान होतं, त्यात आजवर फक्त एक अंश सेल्सियस वाढ असूनही हवामानाने आपण होरपळून जात आहोत. ही वाढ या शतकाअखेर दीड अंश सेल्सियस इथवर रोखण्याचं आवाहन आयपीसीसीने केलं आहे. पण ते शक्य आहे का या शंकेने पूर्ण जग घेरून गेलं आहे.
वर्षअखेरीस अनेक उद्योगधंदे पुढच्या वर्षासाठी योजना तयार करत असतात. तंत्रज्ञानातले ट्रेन्ड्स, अर्थव्यवस्था, बाजारातली तेजी-मंदी, ग्राहकांचा कल अशा गोष्टींच्या आधारे आपण काय करावं, नफा कसा वाढवावा याचं गणित मांडत असतात. मोठमोठ्या कंपन्यांनी यावर्षी प्रथमच त्यात हवामान बदलाचा अंतर्भाव केला आहे. हवामान बदलाचा प्रभाव उत्पादनावर आणि ग्राहकांच्या क्रयशक्तीवर असा दोन्ही बाजूंनी पडत आहे. शिवाय त्याच्यामुळे सर्व अंदाजांमध्ये प्रचंड अनिश्चितता येते आहे. मोठमोठ्या कंपन्या या बाबतीत हवालदिल झालेल्या दिसून येत आहेत.
पण तज्ज्ञांच्या मते आशेला जागा आहे. याच दशकात आपण हवामानबदलाविषयी ठोस पावलं उचलायला सुरुवात केली. सौर ऊर्जेचा वाढता वापर, रिसायकलिंगवर भर, जीवनशैलीत सकारात्मक बदल या साऱ्यांचा परिणाम व्हायला वेळ लागतो. कदाचित येत्या दशकात हा बदल दिसू लागेल या आशेवर या वर्षाला निरोप देऊ या.