मुंबई : लोकांना गृहीत धरल्यानेच भारतीय जनता पक्षाला झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे असे शिवसेनेने म्हटले आहे. झारखंडच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या मुखपत्राच्या अग्रलेखात भाजपला पुन्हा एकदा डिवचण्याची संधी घेतली आहे.
त्यात शिवसेनेने म्हटले आहे की नागरिकत्व सुधारणा कायदा केल्यानंतर आपल्या हिंदु मतांच्या टक्केवारीत वाढ होईल असे गृहमंत्री अमित शहांना वाटले असावे पण तेथील कामगार आणि अदिवासींनी भाजपला नाकारले आहे. महाराष्ट्र आणि हरियानात भाजपला मोठा फटका बसला आहे. हरियानातही कॉंग्रेसने आपले अस्तित्व पुन्हा सिद्ध केले आहे.
त्यामुळे दुष्यंत चौताला यांना बरोबर घेऊन भाजपला हरियानात सरकार स्थापन करण्याची वेळ आली. एकदा लोकांनी सत्ताबदल करायचा ठरवले तर ते कोणत्याही दबावाला भिक घालत नाहीत. सत्ता किंवा पैसा यापैकी कशाचाच प्रभाव त्यावेळी चालत नाही असेही शिवसेनेने म्हटले आहे.
कोणत्याही निकालाचे आत्मचितंन करण्याची भाजपची मानसिकता नाही. जेव्हा तुम्ही लोकांना गृहीत धरून वागता त्यावेळी यापेक्षा दुसरे काहीही घडत नाही. या अग्रलेखात अमित शहा यांच्या कार्यपद्धतीविषयी जोरदार टीका करण्यात आली आहे.
त्यांनी आपल्या प्रचारांच्या भाषणात केवळ हिंदु आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचाच प्रयत्न केला असा आरोपहीं सेनेने केला आहे. सन 2018 मध्ये देशातील 75 टक्के राज्यांमध्ये भाजपची सत्ता होती पण ती आता केवळ 30 ते 35 टक्के इतकीच राहिली आहे.
आज अनेक राज्यांमध्येही भाजपच्या विरोधात सक्त वातावरण झाले आहे असे नमूद करताना त्यांनी म्हटले आहे की आज त्रिपुरा सारख्या राज्यात नव्याने निवडणुका झाल्यास तेथेही भाजप पराभूत झालेली दिसेल.