डॉ. मेघश्री दळवी
एकीकडे दररोज हवामान बदलाचे भयानक अनुभव तर दुसरीकडे भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याची धास्ती, असं आपलं आयुष्य झालं आहे. जागतिक तापमानातली सरासरी वाढ थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर लहानमोठे प्रयत्न सुरू आहेत. पण त्या प्रयत्नांना कितपत यश मिळालंय याची योग्य कल्पना येण्यासाठी सगळे आयपीसीसीच्या (इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) अहवालांकडे आशेने पाहात असतात.
आयपीसीसी 1990 पासून हे अहवाल प्रसिद्ध करत आहे.
आठ वर्षांपूर्वी, 2013 मध्ये पाचवा अहवाल आल्यावर अनेक देश खडबडून जागे झाले होते. जागतिक कीर्तीच्या नावाजलेल्या तज्ज्ञांनी एकमुखाने एकच गोष्ट त्यात सांगितली होती, की आपण आज आता काही केलं नाही, तर हवामानबदल एका अपरिवर्तनीय टप्प्यावर पोहोचेल, तो पुढे कधीही पूर्ववत करणे शक्य होणार नाही. त्यानंतर तापमानातली वाढ रोखण्यासाठी वेगाने हालचाल सुरू झाली. म्हणूनच आता पुढच्या अहवालाची प्रतीक्षा होती.
याच आठवड्यात 9 ऑगस्टला आयपीसीसीच्या वर्किंग ग्रुपचा सहावा अहवाल जाहीर झाला. टोकाचं हवामान, त्याच्यावर परिणाम करणारे शेकडो घटक, त्या सर्वांचं एकत्रित आकलन, हवामानशास्त्रातलं नवनवीन संशोधन, अनेक वेगवेगळ्या शास्त्र शाखांमधील संशोधकांनी या विषयात घातलेली भर, प्रचंड प्रमाणात गोळा केलेली निरीक्षणं, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे केलेलं त्यांचं सखोल विश्लेषण, सोबत प्रादेशिक पातळीवरची हवामानाची मॉडेल्स, कोणकोणत्या प्रदेशाला कोणते धोके संभवतात, या सगळ्या पैलूंचा त्यात परिपूर्ण आढावा घेतला आहे.
या अहवालातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, वितळते हिमनग आणि समुद्राची वाढती पातळी याला रोखणं आता जवळजवळ अशक्यप्राय आहे. अतिकडक उन्हाळा, उष्णतेच्या लाटा, जंगलातले वणवे, चक्रीवादळं, महापूर, प्रचंड दुष्काळ, तीव्र थंडी असे यापुढे ऋतूंचे जहाल अनुभव असतील यावर या अहवालात शिक्कामोर्तब केलेलं आहे.
समुद्राची वाढती पातळी जसजसे किनारे गिळंकृत करत जाईल तसतसे राहण्यायोग्य प्रदेश आणि व्यवसायाच्या संधी कमी होत जातील आणि हे सगळं दूर नसून दर वर्षी वाढत्या वेगाने घडत जाणार आहे. पण अजूनही आशेला थोडी जागा आहे.
आज तापमानवाढ 1.1 अंश सेल्सिअसला पोहोचली आहे. आपण 2040 पर्यंत म्हणजे येत्या वीस वर्षांमध्ये जगाचं निव्वळ कार्बन उत्सर्जन शून्य करू शकलो (नेट झिरो) तर शतकाअखेर ती दीड अंशापर्यंत रोखू शकतो. त्यासाठी आपल्याला कार्बन वातावरणात कमी सोडण्याच्या जोडीला वातावरणात आधीच असलेला कार्बन घटवायची जबाबदारी डोळसपणे उचलावी लागेल.
कार्बन सिक्वेस्टरिंग प्रक्रियेने वातावरणातला कार्बन शोषून जखडून करून ठेवण्याचे काही उपाय आहेत. त्याचं तंत्रज्ञान वेगाने विकसित करून अंमलात आणावं लागेल. जंगलांच्या जोडीला खारफुटी वाचवाव्या लागतील. संसाधनांचा अपव्यय टाळावा लागेल. त्यासाठी आवश्यक ती पैशाची तरतूद करावी लागेल आणि अर्थातच इच्छाशक्तीचं पाठबळ पुरवावं लागेल.