उडपी – कर्नाटकमध्ये हिजाबच्या मुद्द्यावरून तणावाचे वातावरण असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुढील तीन दिवस राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही सध्या कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाची वाट पाहात आहोत, मी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की, त्यांनी विनाकारण वाद घालू नये, शांतता ठेवावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे. तसेच जे कोणी चिथावणीखोर वक्तव्य करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी देखील हिजाबच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी शांतता राखावी असे आवाहन केले आहे. तणाव वाढणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. सरकार पोलीस बळाचा वापर करण्यास इच्छूक नाही, मात्र तशी वेळ प्रशासनावर आणू नका असा इशारा गृहमंत्र्यांकडून देण्यात आला आहे. विद्यार्थांना आवाहन करताना गृहमंत्र्यांनी म्हटले आहे की, आपण सर्व विद्यार्थी आहात, सुक्षित आहात तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करायला हवा.
गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे शाळा बंद आहेत आता कुठेतरी शाळेला सुरुवात झाली आहे. पुढील महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षा आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीत शाळा बंद ठेवणे हिताचे ठरणार नाही. तसेच त्यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी शाळा ही काही एखादी धर्मसंस्था नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक विवाद होणार नाही याची काळजी घ्यावी.