36 हजार 823 विद्यार्थी आजमावणार नशीब; सातारा तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी
सातारा – पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) उद्या, दि. 16 रोजी जिल्ह्यातील 233 केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेस जिल्ह्यातील 36 हजार 823 विद्यार्थी बसले आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.
पाचवीची 132 आणि आठवीची 101 परीक्षा केंद्रे आहेत. मराठी, ऊर्दू व इंग्रजी या तीन माध्यमांसाठी प्रश्नपत्रिका बहुसंची (ए, बी, सी, डी) पद्धतीने देण्यात येणार आहे. प्रत्येक पेपरसाठी स्वतंत्र कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येणार आहेत. या उत्तरपत्रिकेची प्रत (कॅंडिडेट कॉपी) परीक्षा संपल्यानंतर संबंधित पर्यवेक्षकांमार्फत परीक्षार्थींना देण्यात येणार आहे. पाचवीसाठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एक पर्याय अचूक असेल. आठवीसाठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20 टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक आहे. अचूक पर्याय न नोंदवल्यास गुण दिले जाणार नाहीत, असे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
सातारा तालुक्यात पाचवीची 19 केंद्रे व 3,944 विद्यार्थी, आठवीची 16 केंद्रे व 2,679 विद्यार्थी, जावळी तालुक्यात पाचवीची 10 केंद्रे व 789 विद्यार्थी, आठवीची सहा केंद्रे व 562 विद्यार्थी, महाबळेश्वर तालुक्यात पाचवीची पाच केंद्रे व 833 विद्यार्थी, आठवीची पाच केंद्रे व 810 विद्यार्थी आहेत. वाई तालुक्यात पाचवीची 11 केंद्रे व 1561 विद्यार्थी, आठवीची सात केंद्रे व 1982 विद्यार्थी, खंडाळा तालुक्यात पाचवीची चार केंद्रे व 1033 विद्यार्थी, आठवीची तीन केंद्रे व 718 विद्यार्थी, फलटण तालुक्यात पाचवीची 20 केंद्रे व 1895 विद्यार्थी, आठवीची 11 केंद्रे व 1167 विद्यार्थी आहेत.
माण तालुक्यात पाचवीची 10 केंद्रे व 1636 विद्यार्थी, आठवीची 10 केंद्रे व 1324 विद्यार्थी, खटाव तालुक्यात पाचवीची 10 केंद्रे व 1698 विद्यार्थी, आठवीची नऊ केंद्रे व 1286 विद्यार्थी आहेत. कोरेगाव तालुक्यात पाचवीची नऊ केंद्रे व 1653 विद्यार्थी, आठवीची सात केंद्रे व 1306 विद्यार्थी, कराड तालुक्यात पाचवीची 19 केंद्रे व 4135 विद्यार्थी, आठवीची 18 केंद्रे व 2925 विद्यार्थी, पाटण तालुक्यात पाचवीची 15 केंद्रे व 2219 विद्यार्थी, आठवीची नऊ केंद्रे व 1468 विद्यार्थी आहेत. पहिला पेपर सकाळी 11 ते 12.30 व दुसरा पेपर दुपारी 1.30 ते 3 या वेळेत होणार असल्याची माहिती कोळेकर यांनी दिली.